*संपादकीय अग्रलेख*
*कौळाणे(निं.) आणि व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नाचे नेमके राजकीय गौडबंगाल काय?*
*चौकशी अधिकाऱ्यांनीच का घेतली माघार*
वाचकहो,
शासनाचे कुठलेही निर्णय हे लोकहितकारी व विकासात्मक दृष्टीने चांगलेच असतात.मात्र त्याची अंमलबजावणी करणारेच जर सक्षम नसतील तर शासनाच्या निर्णयाचा कसा बोजवारा उडतो,हे कौळाणे (निं.) व व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागा मागणी प्रश्नावरुन लक्षात येईल!
वास्तविक पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जातो.समाजातील भल्या बु-या गोष्टीना तो वाचा फोडून चव्हाट्यावर आणण्याचे कार्य इमाने इतबारे पार पाडीत असतो.आणि अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अभिप्रेत असलेल्या पत्रकार बांधवाना पत्रकार भवन व निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी असा शासनाचाच अध्यादेश परिपत्रक असताना,आणि आम्ही गेल्या १२आँक्टोबर २०२० पासून योग्य तो जागा उपलब्ध करुन द्यावी म्हणून शांततेच्या मार्गाने लढा उभारलेला असूनही,त्याची दखल मुर्दाड प्रशासनाने घेऊ नये म्हणजे हे अतिच झाले असेच म्हणावे लागेल!
किंवा या प्रकरणात कुठला राजकीय दबाव येत असेल तर तेदेखील एक गौडबंगालच म्हणावे लागेल.वास्तविक पत्रकार भवन निवासस्थानसाठी सुरु असलेला आमचा लढा हा विधायक कार्यासाठी असून,तेथे देखील राजकारण खेळून आपली पोळी भाजून घेण्याचा काही बांडगुळाचा डाव म्हणजे विकासाला आडकाटी आणण्यासारखाच ठरतो.तसं बघितले तर वरील दोघाही गावात बेकायदेशीर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे.अतिक्रमणाच्या अजगराने वरील गावाना विळखा घातलेला आहे,मात्र तेथे ग्रामपंचायतीची कर्तबगारी दाखविता आलेली नाही किंवा आपला चोख कारभार दाखवून ठोस कामगिरी करता आलेली नाही.मात्र पत्रकार भवन निवासस्थानाच्या जागेला विरोधाच्या नावाखाली राजकारण खेळून आपली स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा डाव म्हणजे गाव विकासाला खीळ घालण्याबरोबरच संधीसाधू मतलबीपणा ठरतो.मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी शासन परिपत्रकाप्रमाणे व-हाणे येथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांना रितसर कार्यवाही करुन याप्रश्नी अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही त्यांनी या गोष्टीकडे मुद्दामहून कानाडोळा करुन हेतूत दुर्लक्ष चालविले.तर दुसऱ्या बाजूला कौळाणे गावी ग्रामसेवक संजीव घोंगडे यांनी संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या सहमतीने पत्रकार भवनला जागा देण्याबरोबरच कागदोपत्री रेकाँडही बनविले,मात्र राजकीय हेतूने प्रेरीत होऊन घोंगडेचा त्या गावातील कार्यकाळ संपलेला असतानाही,त्यांनी पदावर नसलेल्या सरपंचताईच्या संगनमताने कागदोपत्री अफरातफर करुन राजकारण खेळण्यास सुरुवात केलेली आहे.
आणि अशाच स्वरुपाचा गोलमाल प्रकारही व-हाणे गावात ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्याकडून घडविला जात आहे.जेथे पत्रकारांच्या विधायक कार्यासाठी या पध्दतीने अडवणूक होत असेल तेथे सर्वसामान्य लोकांना हे स्वतःला ग्रामविकास अधिकारी म्हणवून घेणारे काय दशा करत असतील याचा नेमका विचारच न केलेला बरा!व-हाणे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वारंवार लेखी स्वरुपात मागणी करुनही चौकशी अहवाल अद्यापही पंचायत समितीकडून उपलब्ध करुन देण्यात येऊ नये,म्हणजे हा प्रशासनाचा नाकर्तपणा समजायचा का?की कुठल्या राजकीय दबावामुळे या प्रकरणातून चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी यांनादेखील माघार घ्यावी लागली.गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी राजबन्शी यांना कारणे दाखवा नोटीस काढली हा भाग अलहिदा!
मात्र अजून किती काळापर्यत हे कागदी घोडे प्रशासनापुढे नाचवायचे? म्हणजे विधायक कार्याला आडफाटा आणून बेकायदेशीर पणे अतिक्रमण करुन अवैध धंदे करणाऱ्याची पाठराखण करण्याचेच धोरण प्रशासनाचे आहे काय? वास्तवता या कौळाणे(निं) आणि व-हाणे पत्रकार भवनच्या जागाप्रश्नी लवकरच निर्णय न घेतल्यास सदरचे प्रकरण राज्यपाल व लोकआयुक्त यांचे दरबारात नेले जाणार असून,आमचा येथील न्यायदेवतेवर विश्वास आहे त्यामुळे वेळप्रसंगी सदरचे हेच प्रकरण न्यायालयात देखील घेऊन जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे.एवढेच..यानिमिताने!
Home Breaking News कौळाणे(निं.) आणि व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नाचे नेमके राजकीय गौडबंगाल काय?* *चौकशी...