*पालघर जिल्ह्यात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हाधिकारी शिंदेचे आवाहन*
पालघर (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-४ऑगस्ट रोजी सातपाटी येथील मोरेश्वर विष्णू चौधरी यांच्या मालकीची “प्राजक्ता IND- MM-604 ही नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली. परंतु 3 ऑगस्टपासून समुद्रात वादळी वारे आणि महाकाय लाटांचा फटका बसल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट रोजी समुद्र किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही नौका सातपाटी समुद्रानजीक पोहोचली. मात्र त्याच दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरु झाल्याने खाडीत येण्यासाठी असणारा नौकानयन मार्ग नौकेवरील मच्छिमारांना दिसेनासा झाला. मार्ग दिसेना झाल्याने ही नौका दगडी बंधाऱ्यावर आदळून फुटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून नौकेवरील 15 मच्छिमार सुखरूप आहेत. मात्र या अपघातात नौकेसह इतर साहित्याची हानी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सातपाटी गावातील इतर मासेमारी साठी गेलेले नौका मधील साहित्य तसेच मासे पकडण्यासाठी जाळे वादळात वाहून गेले असून मच्छिमार बंधू हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात 5 व 6 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तथापि, ही शक्यता पाहता पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी वरील दोन दिवसांत अनावश्यक प्रवास करणे टाळले पाहिजे. नद्या, नाले, धबधबे, झरे आणि समुद्रकिनारे जाण्यास टाळा. या कालावधीत मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाऊ नये. मुसळधार पावसाची शक्यता पाहता पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन डॉ. कैलास शिंदे यांनी केले.