आशाताई बच्छाव
नवरात्रौत्सव काळात देवीची उपासना विशेष फलदायी
परमेश्वर प्राप्ती म्हणजे परमगती नव्हे तर ह्या भूलोकात वावरत असतांना देखील त्याच्या सान्निध्यात असल्याची अनुभूती. नामस्मरण करते वेळी चित्त स्थिर करून त्या परमेश्वराच्या सान्निध्यात आपण असल्याची अनुभूती किती तरी लोकांनी घेतली आहे. म्हणूनच नामस्मरण करतांना शक्यतोवर जे नामस्मरण करतो त्याची आकृती अदृष्यात डोळ्यांसमोर निर्माण करावी. त्याने आपल्याला त्याच्याशी संपर्क साधण्यात मदत मिळते. पण हे सर्व तेव्हाच शक्य असते जेव्हा चित्त स्वस्थ असते, म्हणून दिवस भर जरी नामस्मरणात वेळ घालवला पाहिजे. त्याचप्रमाणे नवरात्रौत्सव काळात प्रत्येकाने देवीची उपासना, पुजा-अर्चा, अभिषेक, दुर्गा सप्तशती पाठ, देवीची ओटी भरणे आदी सर्व धार्मिक विधी मनोभावे केली पाहिजे. नवरात्रीत देवी उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असून नवरात्रोत्सवात देवीची उपासना विशेष फलदायी आहे.
कुलदेवतेच्या उपासनेमुळे आधिभौतिक व आधिदैविक स्तरांवर सुख समृद्धी, स्थैर्य व क्षेम प्राप्त होते, ज्या ज्या वेळी सृष्टीतले अखिल प्राणिमात्र परसंकट व परचक्र यांच्या आवर्तात सापडले त्या-त्यावेळी जगदीश्वराने विष्णु, शिव, गणेश, सूर्य, देवी या देवतांचे अवतार घडवून संकटपरिहार केला त्यानुसार हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, रावणाचा संहार करणारा राम, कंसाचे पारिपत्य करणारा कृष्ण, महिषासुराचा नाश करणारी दुर्गा, दुर्भिक्ष्यकालात शाकनिर्मिती करून भरणपोषण करणारी शाकंभरी इत्यादी अनेक अवतारांकडून वेळोवेळी प्राणीमात्रांचे रक्षण घडले. मनुष्याने आपला शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा, हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते.
सौ स्मिताताईं शेखर कुलकर्णी
विश्वस्त ब्राह्मण महासंघ