आशाताई बच्छाव
चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे.आज या बैठकीत अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडीतील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय.या निधीतून विविध प्रकारची कामं होतील,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
अहिल्यानगरमध्ये मुलींचे स्वतंत्र आयटीआय कॉलेज उभारणार
चौंडीत पार पडलेल्या या बैठकीत अष्टविनायक मंदिरासाठी १४७ कोटी रुपये, तुळजापूर मंदिरासाठी १६५ कोटी रुपये, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी रुपये, सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये असे एकूण ५ हजार ५२० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय कॉलेज देखील उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर येणार चित्रपट
या बैठकीत राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले तेच काम आमचं सरकार करणार आहे. अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट बहुभाषिक असेल. शिवाय हा केवळ जीवनपट नसेल तर प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना सुरु
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा यासाठी यशवंत योजना सुरु केली आहे. आता १० हजार विद्यार्थी आपण यातून शिकवणार आहोत. सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना सुरु करत आहोत,अशी महत्वपूर्ण घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीत केलीय.
अहिल्यादेवींच्या काळातील जलाशयांचे होणार संवर्धन
अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या विहिरींसाठी जलसंधारण विभागाने काम हाती घेतलं आहे. ज्यात त्यांचे पुनरुज्जीवन आपण करणार आहोत. ज्यामध्ये १९ विहिरी ६ कुंड ३४ जलाशयाच्या संवर्धनाचे काम करणार आहोत. सोबतच राहुरी दिवाणी न्यायालयाला ही मान्यता दिली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मेळावा होतो. त्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्ताने डाक तिकीट सह प्रेरणा गीत देखील जारी केलंय. ज्याप्रकारे या देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या माध्यामातून केलं गेलं त्याच पावलावर पाऊल टाकत सरकार पुढे जात आहे,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.