आशाताई बच्छाव
श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध – खा. वाकचौरे
वाकचौरे यांच्या निवडीने मतदार संघाला सुशिक्षित व जनतेची कामे करणारा खासदार मिळाला- आ, कानडे
महाविकास आघाडीच्यावतीने खा. वाकचौरे यांचा सत्कार
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने पूर्वीप्रमाणेच यावेळीही माझ्यावर विश्वास दाखवून निवडून दिले, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील शेती, वीज, पाणी, उद्योग यासह इतर प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
खा. वाकचौरे यांच्या विजयानिमित्त यशोधन संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी खा. वाकचौरे बोलत होते. आमदार लहू कानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, महिला प्रदेश सरचिटणीस डॉ. वंदना मुरकुटे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयक संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष लखन भगत, राधाकिसन बोरकर, अशोक थोरे, सचिन बडदे, रमेश घुले, रोहित वाकचौरे, उद्योजक अंकुश कानडे, लाल पटेल, माजी जि. प. अध्यक्ष मिस्टर शेलार, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, कलीम कुरेशी, मुख्तार शहा, माजी गटविकास अधिकारी श्याम पुरणाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष बाळासाहेब उंडे, ऍड. राजेश बोर्डे, विष्णुपंत खंडागळे, रज्जाक पठाण, मल्लू शिंदे, माजी सभापती वेनुनाथ कोतकर व पी. आर. शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, विजय शेलार, गणपत औताडे, सुजाता बारगळ, राणी देसर्डा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी प्रास्ताविक करून निवडणुकीतील विविध घटकांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत केले.
त्यानंतर सत्काराला उत्तर देताना खा. वाकचौरे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यातील विविध प्रश्नांची मला जाण आहे. अनेकांनी आपल्या भाषणातून शेती, वीज, पाणी, उद्योग, शहरातील रेल्वे, बस स्थानक या प्रश्नांची उकल केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील. तालुक्यात तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाला वाव असून त्यासाठी प्रयत्न करू, शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत मुक्त करावयाचे असेल तर सोलर वीज पंप मोफत देण्याची प्रथम मागणी आपण करणार आहोत, त्यामुळे शेतकर्यांना २४ तास वीज मिळेल. प्रत्येक गावात जलजीवन योजनेची कामे सुरू आहेत. परंतु अजूनही लोकांना पाणी मिळालेले नाही. सरकारचा हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे-नाटे आरोप केले, साईबाबा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आपण आ. कानडे व महाविकास आघाडी यांच्याबरोबर असल्याने काळजी करू नये. आ. कानडे व आपण दोघे मिळून तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणू, असे खा. वाकचौरे म्हणाले.
आ. कानडे म्हणाले, श्री. वाकचौरे व आपण दोघांनीही प्रशासनात काम केले आहे. आमचा प्रवास कष्टाचा होता. प्रशासनाने आम्हाला संयम शिकविला. आता आम्ही दोघे सोबत आहोत. निवडणूक काळात आम्ही गाव न गाव पिंजून काढले. पदयात्रा केल्या. ही निवडणूक आमची आहे, असे समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले. मतदार संघात भाजपला सतत मताधिक्य मिळाले. ते कमी करण्यात यश आले. आपल्या कार्यकाळात श्रीरामपूरला जोडणारे सर्व रस्ते चौपदरीकरण करून डांबरीकरण केले. नेवासा फाटा ते बाभळेश्वर रस्त्यासाठी १६७ कोटीचा निधी आणला. शेती, पाणी व विजेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेली दहा वर्ष खासदार म्हणून आम्हाला कोणतीच साथ मिळाली नाही. याउलट आम्ही मंजूर केलेल्या कामांची त्यांनी उद्घाटन केली. दहा वर्ष अज्ञानी प्रतिनिधी पाठवून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. आता सज्ञान व ज्ञानी लोकप्रतिनिधी लाभला असून त्यांच्यामार्फत तालुक्यातील प्रश्न सोडवून विकास कामे होतील, असा विश्वास आ. कानडे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यासह राहुरी तालुक्यातील ३२ गावातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, गाव प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्यने हजर होते. यावेळी विविध पक्ष संघटना व पदाधिकाऱ्यांनी खा. वाकचौरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, संजय छल्लारे, सचिन बडदे, नानासाहेब बडाख, बाळासाहेब उंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सचिन जगताप यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस सतीश बोर्डे यांनी अनुमोदन दिले. सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक मुख्तार शहा यांनी आभार मानले.
………………………….