राजेंद्र पाटील राऊत
मोठी बातमी! राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध हटवले; मास्क देखील ऐच्छिक..!
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात करोनाचे निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणं हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना दिली आहे. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ एप्रिल अर्थात उद्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.