🛑 खोटी माहिती पसरविल्याने पोलिसांत गुन्हा दाखल 🛑
औरंगाबाद:( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
औरंगाबाद:- करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरामधील ‘लॉकडाऊन’बाबत नागरिकांत संभ्रम निर्माण हाईल असे खोटे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविले जात आहेत. हा बनावट संदेश पसरविणाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश, शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक, जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही, सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी दहा ते दुपारी चारदरम्यान मनाई केलेल्या आस्थापनांव्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा…,’ अशा स्वरुपाचा हा संदेश आहे. हा संदेश पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटा संदेश विविध ‘व्हॉट्स अॅप ग्रुप’वर प्रसारित केला होता, परंतु हा संदेश कोणत्याही अधिकृत प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला नाही. या संदेशामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. हा संदेश जाणिवपूर्वक प्रसारित केल्याचे निदर्शनास आल्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल सुशांत शेळके यांच्या फिर्यादीवरून सदर बनावट संदेश प्रसारित करणाऱ्या अज्ञात ‘व्हॉट्स अॅप’ वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सविता तांबे करीत आहेत.
अफवा पसरविल्यास कारवाईचा पोलिसांचा इशारा
समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल, अशाप्रकारची माहिती अगर लिखाण प्रसारित करू नये म्हणून यापूर्वी औरंगाबाद शहर पोलिसांनी आवाहन केले आहे. अशा प्रकारे अफवा पसरवणारे लिखाण अगर माहिती कोणीही सोशल मीडियावर प्रसारित किंवा ‘फॉरवर्ड” केल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.