आशाताई बच्छाव
रंगभूमी गाजविणारे आजारग्रस्त नटसम्राट प्रकाश वानखडे यांना मानधन केव्हा मिळणार ? वाशिम ,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- एकेकाळी कारंजा येथे पंचरंगी कलापथक मंडळाद्वारे रंगभूमी गाजविणारे नटसम्राट कलावंत प्रकाश व्यंकटराव वानखडे सध्या उतारवयात आजाराने ग्रस्त असून त्यांना जीवन जगण्यासाठी शासनाच्या मानधनाची नितांत गरज आहे. मात्र गेल्या सहा वर्षापासून त्यांच्या प्रस्तावावर शासनाने अद्यापही विचार केला नसून अशा खर्या कलावंतांची कदर करुन शासनाने त्यांना विनाअट मानधन मंजूर करावे अशी मागणी होत आहे.
नटसम्राट प्रकाश वानखडे यांचे नाव आजही जुन्या पिढीतील कला रसिकांच्या ओठावर आहे. बालपणापासून आपल्या विनोदी नकलाने कारंजा शहरातील श्री महाराणा प्रताप व्यायाम शाळेचा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, पोळा, होलिकोत्सव गाजविणारे १९८०-१९९० च्या दशकातील नटसम्राट प्रकाश वानखडे यांनी कारंजा येथे लोककलावंत ज्ञानेश्वर कडोळे, शाहीर देवमन मोरे, महाराणा प्रताप यांची भूमिका वठविणारे स्व.विजय गुल्हाने, प्रकाश गवळीकर आदी मित्राच्या संगतीने पंचरंगी कलापथक मंडळाची स्थापना केली होती. कारंजा जेसीज क्लबच्या सांस्कृतिक कला महोत्सवात ते दरवर्षी हिरीरीने भाग घ्यायचे. व पारितोषिकही पटकवायचे. सत्वर पावजो मला रे, घोंगड्या रोटगा वाहीन तुला, या लघुनाट्यात देव अंगात आणून ते अंधश्रद्धेवर प्रहारही करायचे. असा हरहुन्नरी कलाकार आज वयाची सत्तरी पूर्ण झालेला आहे. त्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय असून ते स्वतः आणि पत्नी दोघेही आजारी आहेत. त्यांच्या एका मोठ्या मुलाचा अकाली मृत्यु झालेला तर दुसरा मुलगाही रक्तदाबाने ग्रस्त असून वृद्धापकाळी आजाराने त्यांना रोजमजूरी करता येत नाही. त्यांनी शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्धापकाळ साहित्यीक कलाकार मानधन योजनेकरीता गेल्या पाच सहा वर्षापासून प्रस्ताव टाकलेला आहे. मात्र सदर प्रस्ताव अद्यापही शासनाने मंजूर केला नाही. तरी एकेकाटी रंगभूमि गाजविणारे मात्र उतारवयात जगण्याचा संघर्ष करणारे प्रकाश वानखडे या गरजू वृध्द कलावंताला शासनाने विनाअट मानधन मंजूर करावे अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.