आशाताई बच्छाव
33 वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र, शाळेत रंगला माजी विद्यार्थी मेळावा.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 25/09/2024
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथील माजी विद्यार्थ्यांचे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा अनोखा सोहळा अत्यंत आनंदमयी जिल्हा परिषद शाळेत येथे नुकताच पार पडला. यावेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्या वेळचे मुख्याध्यापक श्री.रामदास घाडगे सर, श्री.उमाकांत काळे सर,श्री.जगन्नाथ शिंदे सर,श्री.भैयालाल जयस्वाल सर यांच्यासह १०० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र अशक्यही नसते, ज्या शाळेत आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या शाळेतील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्र- मैत्रिणीं सोबत पुन्हा 33वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली. ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळे
मागील तिन ते चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी “माझी शाळा – माझे गुरू” या नावाने व्हाट्स अँप ग्रुप मधून एकमेकांशी संपर्क येत होता अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्र मैत्रिणींनी सकारात्मक प्रतिसाद देत एक दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथे भेटण्याची योजना आखून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला.
शेवटी ता.२३सप्टेंबर २०२४ अखेर तो दिवस उजळला हळूहळू सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथील १०० हुन अधिक विद्यार्थी,माजी वर्गमित्र इतक्या वर्षानंतरही पहिल्या भेटीत शाळेतील ते चेहरे आठवित होते. व हळुहळु सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवारा_ विषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालल आहे हे एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.
विद्यार्थ्यांनी आज आपल्या मित्र-मैत्रिणीकडे बघितले तर ३३ वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आयुष्यातले सर्व क्षण आठवणीत राहतात असे नाही, पण काही क्षण असे असतात की, जे विसरु म्हणताही विसरता येत नाही. आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा आपापल्या क्षेत्रात कितीही यशस्वी झालो तरी शाळेचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही, पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाही. पण ह्या सर्व आठवणी अस्मरणीय असतात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथिल स्नेहमिलन सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे बालपण आठवण करीत शाळेतील गमतीशीर टिंगलटवाळी करीत, विविध खेळ खेळत, हसतमुख गाणी गात नृत्य करीत आनंदी प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. या स्नेह मिलन सोहळ्यात ३३ वर्षापूर्वीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोडा कदम येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी हे पुणे,आळंदी,छ.शंभाजी नगर, जालना, मुंबई,परभणी, नाशिक येथुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.