आशाताई बच्छाव
प्रतिनिधी | देवळा भिला आहेर
देवळा ,शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवळा पाचकंदिल येथे दि.२६ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नायब तहसिलदार दिनेश शेलुकर यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा की ‘ देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये. प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करून अन्न धान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांशी उदयोग धंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर आवलंबून आहे.
शेतकऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्धवस्त होईल. ‘शेतकरी जगेल तरच देश जगेल’ असे असतानाही केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असताना शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी कुठलेही ठोस पावले उचलले जात नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, बेमोसमी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी. याकरिता देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार दि. २६ रोजी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्त व्हावा, शेतकरी वीज बील माफ करावे आदी मागण्यांसाठी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसिय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी यावेळी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी शिरीषकुमार कोतवाल यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असतांना घेतलेल्या भुमिकेवरून टिकेची झोड उठवली, तसेच मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी देवळा तालुक्यातील पाणी प्रश्न चणकापूर उजव्या कालव्याचे विस्तारीकरण, झाडी एरंडगाव वाढीव कालवा आदी प्रश्न अद्यापर्यंत मार्गी लागले नसल्याबद्दल खरपूस समाचार घेतला.
आंदोलनात प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, तालुका अध्यक्ष दिनकर निकम, समन्वयक आर्की. स्वप्निल सावंत, कार्याध्यक्ष दिलीप आहेर, महिला तालुकाध्यक्ष अरुणा खैरणार, सटाणा शहराध्यक्ष किशोर कदम,रती पाटील, संजय सावळे, संजय पवार, कैलास शिरसाठ, पंडित निकम, प्रसाद चव्हाण, रावसाहेब पवार, कैलास पवार, ओमकार निकम, योगेश पवार, दिलीप पवार, संदीप पवार, देवराम अहिरे, प्रवीण सूर्यवंशी, बाळासाहेब खैरनार, गणेश देवरे, तुषार शिंदे, विनोद आहेर, रितेश निकम, समाधान ठाकरे, देविदास ठाकरे, संदेश निकम, अरुण गांगुर्डे, अरुण पवार आदी सहभागी झाले होते.