आशाताई बच्छाव
शहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले
प्रभागा दोन मधील तुंबलेल्या नाल्या व नाले जेसीबीव्दारे साफ करण्याची मागणी
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- मे महिना संपून शेतकर्यांसह सर्वांना जुन महिन्याच्या मान्सुनचे वेध लागले आहेत. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांना मान्सुनपुर्व कामाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक दोन विनायक नगर भागातील रस्ते व नाल्यांची शोचनिय अवस्था झाली असून अनेक नाल्या व नाले तुंबलेल्या आहेत. नगर परिषदेने मान्सूनपुर्व कामामध्ये या नाल्या जेसीबीने साफ करण्यासह या भागातील अर्धवट राहीलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करुन नागरीकांना पावसाळ्यात होणार्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका श्रीमती करुणाताई राजु कल्ले यांनी २२ मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, मान्सूनचे सर्वांना वेध लागले असून त्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे उरकून घेण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. मात्र शहरातील विविध प्रभागात मान्सूनपुर्व कामांना गती मिळाली नसून प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध नाल्या व मोठे नाले कचर्याने तुडुंब भरलेल्या आहेत. पावसाळ्यात ह्या नाल्यावरुन पाणी वाहून दुर्गंधीयुक्त पाणी नागरीकांच्या घरात जावू शकते. या बाबीकडे लक्ष देवून नगर परिषदेने जेसीबीव्दारे मोठे नाले व नाल्या साफ कराव्या. यासोबतच विनायकनगर कडे जाणार्या रस्त्यावर खूप गड्डे आहेत. त्यामध्ये बसस्थानक ते समाजकल्याण कार्यालय, गजानन महाराज चौक ते पोलीस ग्राउंड तसेच विनायकनगर भागातील अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. यासोबतच गव्हाणकरनगर, नाईकनगर, नवीन बालाजी मंदिर जवळील लोनसुने चौक ते गव्हाणकरनगर जाणार्या अर्धवट रस्त्यावर मुरूम टाकणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचून विद्यार्थ्यांसह वृध्दांना मोठा त्रास सोसावा लागतो. त्यामुळे प्रभागातील कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकण्यासह प्रभागातील सर्व मोठे नाले व नाल्या स्वच्छ करुन देण्यात याव्या अशी मागणी श्रीमती करुणाताई कल्ले यांनी केली आहे.