Home नांदेड स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडू नका प्रविण साले यांचा अशोक चव्हाणांसह काँग्रेसला...

स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडू नका प्रविण साले यांचा अशोक चव्हाणांसह काँग्रेसला सल्ला

128
0

राजेंद्र पाटील राऊत

स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडू नका
प्रविण साले यांचा अशोक चव्हाणांसह काँग्रेसला सल्ला

 

नांदेड प्रतिनिधी / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड जिल्ह्याचे खासदार असताना अशोक चव्हाण यांना लोकसभेत कामगिरी बजावता आली नाही. त्यामुळेच नांदेडच्या जनतेनी त्यांना साफ नाकरले होते. नांदेडच्या काँग्रेसने अशोक चव्हाणांना विकासाच्या कामात आलेले अपयश मारण्याचा प्रयत्न चालविला असून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाल्याने ते सभागृहात उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे सभागृहात प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रश्‍नच उरत नाही, त्यामुळे अशोक चव्हाण आणि काँग्रेसने आपल्या पराभवाचे खापर दुसर्‍याच्या माथी फोडू नये असा खोचक सल्ला भाजप शहर महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिला आहे.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित करण्यात मराठवाड्यातील खासदारांमध्ये खालून पहिला नंबर पटकावला तर मौनीबाबा असे त्यांना उपाधी मिळाल्याचा उरबडवेपणा काँग्रेसने सुरू केला आहे. वास्तविक गेल्या दीड वर्षांपासून देशभर कोरोना महामारीचे संकट आहे. ज्या-ज्या वेळी सभागृहात खासदारांना उपस्थित राहण्याची वेळ होती, त्या-त्यावेळी प्रत्येक खासदारांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. दुर्देवाने तब्बल दोनवेळा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने त्यांना सभागृहात उपस्थित राहता आले नाही. सभागृहात उपस्थित राहता आले नसले तरी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मंजूर करून घेतला. ऑक्सीजन प्लांट मंजूर करून घेतले, रूग्णवाहिका मंजूर करून घेतल्या. हे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी विसरू नये. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यामुळे पाच वर्षांच्या काळात अशोक चव्हाण यांनी खासदार म्हणून सभागृहात किती प्रश्‍न उपस्थित केले, त्यांना जनहिताचा किती कळवळा होता हे काँग्रेसजणांनी आत्मचिंतन करावे. केवळ खा. चिखलीकरांवर टीका केल्याने आपला टीआरपी वाढता अशी बालबुद्धी सोडून अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी बालिशपणा सोडून द्यावा.
जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करून नांदेड जिल्ह्यातील जनतेला विकासाची दिलेली आश्‍वासने पुर्ण करावीत असा सल्ला देत प्रविण साले म्हणाले, काँग्रेसला राज्यात मरणकळा आल्या असताना दुर्देवाने मिळालेली सत्तेतली संधी जनहिताच्या कामासाठी वापरावी. टीका-टिप्पणी करून जनतेची दिशाभूल करत ‘अशोकप्रभा’ चालविण्याचा प्रयत्न करू नये, कारण यापुर्वी ‘अशोकपर्व’चा शेवट नांदेडकरांनी कसा केला आहे हेही विसरू नये, अशी कोपरखळीही साले यांनी लगावली आहे.
सभागृहात प्रश्‍न विचारणार्‍या खासदारांमध्ये ज्यांची नावे काँग्रेसजणांनी जनतेत पोहचविण्याचा प्रयत्न केला त्यातील बहुतांश खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत.
त्यामुळे विरोधीपक्षाला प्रश्‍न विचारण्याशिवाय आपणास जनतेचा कळवळा असल्याचे दाखविताच येत नाही.
याही बाबीचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जाणिवपुर्वक विचार करावा. वैयक्तीक आकसपणे टीका न करता परिस्थिती मागील सत्य जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा आणि बिनबोभाट बोलत सुटणे थांबवावे असेही प्रविण साले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here