Home माझं गाव माझं गा-हाणं राजधानीचे अजमीर सौंदाणे …! माझं गांव;माझा अभिमान!!

राजधानीचे अजमीर सौंदाणे …! माझं गांव;माझा अभिमान!!

170
0

राजेंद्र पाटील राऊत

राजधानीचे अजमीर सौंदाणे….!   माझं गांव; माझा अभिमान!!                                                 सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
गाव म्हणून असलेल्या गुणांशिवाय आणखी काही वैशिष्ट्यांनी एखादं गाव सजलेलं असेल तर तेथे राहणाऱ्यांच्या मनातही त्या वेगळेपणाविषयी कुतुहल निर्माण झालेलं असतं. मात्र मनातल्या त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणेचा इतिहास आजही अज्ञात आहे. ही सफर त्या गावाबद्दलचं कुतुहल वाढवते.

गाव म्हणजे काय? गावाला वेस का असते? एक वेशीचं अन् दोनहून अधिक वेशी असतील तर? गावाला कोट का असतो? वेस, कोट नसलेली गावे कशी असतात? बाराबलुतेदारी असलेले गाव म्हणजे काय? गावाबद्दलच्या अशा अन् अशासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं माणूस समूहाने राहू लागला तेव्हापासूनच्या त्याच्या जगण्यातल्या जडणघडणी अभ्यासल्या की मिळू लागतात. गावच्या हद्दीला शीव म्हटले जाऊ लागलं अन् माणसं राहतात त्या पांढरीला गावठाण. गाव मोठं असेल तर दोनपेक्षा अधिक वेशी आणि मग त्यानुसार बंदोबस्तासाठी सैनिकांची गरजही पडते. जातीनुसार व्यवसाय, जबाबदाऱ्या व राहण्यासाठी गल्ल्यानिर्माण झाल्या. एकमेकांमध्ये देवाणघेवाण व व्यवहार अन् आली करव्यवस्था यातून पाटील, कुलकर्णी, वतनदार व इतर ग्रामाधिकारी निर्माण झाले. प्रथा, उत्सव, परंपरा या गावाला एकजीव करतात. देशाभिमानाप्रमाणेच गावाभिमान निर्माण झालेला गावोगावी दिसतो. पोरगा किती लांब गेला तरी गावाला विसरत नाही. कारण त्यांच्या आठवणींच्या पाऊलखुणांनी गाव सोडलेलं नसतं. आशा, आकांक्षा, राजकारण, समाजकारण, विश्वास, नातीगोती यांच्या मंथनातून गाव असचं उभं राहतं. असाच अनुभव सटाण्यातील अजमेर सौंदाण्याची सफर करताना येतो.

नाशिकहून सटाणा पोहचलात की, सटाण्यातून अजमेर सौंदाणे पाच-सहा किलोमीटवर आहे. अजमेर हे गाव गायमुख (लखमी नालाही म्हणतात) व डोहणी नदीचा संगमावर वसलेले आहे. गावात जाण्यासाठी नदीवरील पूल ओलांडून जावे लागते. मात्र, त्यापूर्वी उजव्या हाताला शनीमंदिर आपले स्वागत करते. शनीमंदिराशेजारी एक व समोरच्या बाजूला एक अशा दोन बारवा पहायला मिळतात. दोन्ही बारवा बऱ्याचशा बुजल्याने आता वापरात नाहीत. त्या आता एखाद्या कुंडासारख्या दिसतात. एका बारवेला दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत. शनी मंदिरासमोर पूर्वजांच्या आठवणीत तयार केलेले काही चिरे झाडाखाली पहुडलेले दिसतात. तेथून पुलाकडे जाताना डाव्या हाताला मूर्तीकार किशोर सोनवणे यांचा स्टुड‌िओ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महापुरूषांचे फायबरचे मोठाले पुतळे तेथे पहायला मिळतात. गावात कलाकार नसेल तर ते गाव काय कामाचं, हा सोहळा पाहताना वाटतं.

‘शिल्पांच्या वेगळेपणात जीव ओतण्यातच मजा आहे’, असे म्हणणारे सोनवणे मनाला भावतात. अजमेरची सुरूवातच कलेने झाल्यामुळे गाव नक्कीच वेगळं असणार या ओढीनं मन गावच्या वेशीबाहेर तिच्या भव्यतेला पाहत थबकतं. २१ तोफांची सलामी द्यावी त्याप्रमाणे ‘आमच्या गावाला २१ बुरूज आहेत’, असे ज्ञानेश्वर भालचंद्र पवार, दिपक खुशाल शेवाळे, रणजितसिंह पवार पोलीस पाटील, चंद्रकांत ध‌िवरे, किरण नथु पवार, अनिल नारायण पवार ही ग्रामस्थ मंडळी अभिमानाने सांगतात. अजमेर सौंदाणे म्हणजे काय? या प्रश्नांचे उत्तर अजूनही अनुत्तरीच होतं. अजमेर म्हणजे अजय मेरू. अजमेरची ओळख गावाच्या शेजारी असलेल्या अजमेर किल्ल्यावरून मिळालेली आहे. पूर्वी हे गाव किल्ल्यावर होतं. तेथून ते पायथ्याशी असलेल्या पाडेश्वर मंदिरालगत आलं. पाडेश्वर हा परिसर वनविभागाच्या अंतर्गत असल्याने निसर्गसौंदर्य अमाप आहे. गाव तेथून ते शनीमंदिराजवळील पांढरीवर आलं आणि गावाने पुन्हा नदी ओलांडून आता सध्या जेथे गाव आहे तेथे विसावलं. चार ठिकाण बसलेल्या या गावाचे हे विस्थापन त्या राजसत्तेच्या काळात गरज म्हणून अथवा परिस्थिती म्हणून झालं असावं. हा मेरू म्हणजे डोंगर अथवा किल्ला अजय राहिला असेल म्हणून त्याला अजमेर म्हटले गेले असावे.

पूर्वी गावाचे नाव फक्त अजमेर असेल. कालौघात व्यापारासाठी हे गाव प्रसिद्ध झाल्याने सौद्याचं सौंदाणे असं म्हटलं गेलं असावं म्हणून गाव अजमेर सौंदाणे म्हणून ओळखलं जावू लागलं. खरंतर हा सगळा झाला अंदाजाचा खेळ. मात्र, मूर्तीकार किशोर सोनवणे हे गाव अभिरांची वस्ती मानतात. अभिरांची वस्ती असेलेले अजमीर पुढे अजमेर झाले असावे असे, ते सांगतात. अभिरांचा या परिसराशी आलेला संबंध पाहिला तर हा अंदाजही मनाला स्पर्श करून जातो. म्हणूनच ही अभिरांची राजधानीही म्हटली जाते. आजही अजमेरकर राजधानीचे गाव म्हणवून घेतात. त्यानंतर तेलीराजा, राजपूत राजांची ही राजधानी राहिली. मीर कासिमने गाळणा घेतला तेव्हा ही राजधानी उद्धवस्त केली अन् अजमेर किल्ल्यावरील मोठाले लोखंडी आठ दरवाजे गाळण्यावर ओढून नेले. हे दरवाजे इतके भक्कम अन् जड होते की, दरवाजा ओढणारे हत्ती मरण पावला होता. गाळण्याच्या शिलालेखात अजमेरचा उल्लेख अन् ते दरवाजे तेथे असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

अजमेर सौंदाणेच्या वेशीबाहेर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांचा पुतळा आहे. समोरच रामाचे मंदिरही आहे. अजमेरची वेस काही वेळ पहात रहावीशी वाटते, ती तिच्या अजूनही असलेल्या भक्कमपणामुळे अन् ध्रुव ताऱ्यामुळे. असे म्हटले जाते की, उत्तरमुखी असलेली या वेशीवर मध्यरात्री ध्रुवतारा डोक्यावर येतो. गावाला उत्तर-दक्षिण वेस, तसेच इतर दिशांनाही लहान लहान ये-जा करण्यासाठीचे दरवाजे होते. वेशीच्या कोटाला २१ बुरूज होते. यातील १७ बुरूज कोटांचा भाग होते तर तीन वेशी वेसदरवाजा दिसणार नाही, अशा पद्धतीने कोटाबाहेर होते. यातील १८ बुरूजांचे अवशेष आजही पहायला मिळातात. वेशीवरच्या काष्ठशिल्पांचे सौंदर्य नजरेत साठवून समोरच्या पेठ गल्लीतून गावात शिरताना एका प्राचीन इतिहास असलेल्या गावात प्रवेश करीत असल्याचा आंनद मिळतो. लहान, मोठे वाडे तर गावाच्या नसानसात फुलले अन् आता मावळतीलाही लागले आहेत. गावगाड्यानुसार सुतारगल्ली, शिंपीगल्ली, चांभार, पेठ, धनगर, माळी अशा गल्ल्या फिरताना अंड्याच्या आकाराचे हे गाव एक वेगळाच अनुभव देते. पूर्वीपासून गावात ५२ जातीचे लोक गुण्यागोंविदाने राहतात. पेठ गल्लीवर धन‌िकांचे वर्चस्व दिसते. पेठ गल्लीत सावकारांचे आता आतापर्यंत वर्चस्व होते, असे गुलाबराव मगर सांगतात. त्यांचे १६ खणी वाडे आजही पहायला मिळतात. उन्हापासून बचावासाठी गावात आजही धाब्याची घरे पहायला मिळतात. अर्थात नवीन सिमेंटच्या बांधणीच्या घरांची संख्या वाढू लागली आहे. मगर तसेच इतर काही मंडळी मूळची राजपूत राजस्थानहून येथे विसावली, असे ज्ञानेश्वर भालचंद्र पवार, भूषण रणजितसिंह मगर व जितेंद्र विजयसिंह पवार सांगतात.

पेठ गल्लीतून आखाडा नावाच्या पडक्या इमारतीपाशी आले की, पुन्हा अजमेरचा एक अनोखा पैलू समोर येतो. या आखाड्यात दोन-तीन लहान तोफा आहेत. तसेच आखाड्याच्या तळघरात तलवारी होत्या. आता त्या जम‌िनत गाडल्या गेल्या आहेत. त्या तोफांचा वापर पेंढाऱ्यांना पळवून लावण्यासाठी केला जात. असे सांगितले जाते की, पेंढाऱ्यांना पळवून लावण्यासाठी त्यावर या तोफांच्या माध्यमातून गव्हाची गरमगरम खळ उडविली जात असे. खळीच्या गरम चटक्यांमुळे ते प्रचंड भाजत. मात्र खळी उडविणारेही जखमी होत असल्याने गावात भाजली त्वचा लवकरच बरी करण्यासाठी त्या विशिष्ट्य औषधीही बनविली जाते. प्रत्येक घरात हे औषध कसे बनवायचे याचे पिढ्यान् पिढ्या धडे दिले जायचे. आता मात्र यांची गरज भासत नसली तरी कोणाला भाजले तर अजमेरकरांच्या औषधाची सर्वांना आठवण होते. आखाड्याचा दरवाजा व त्यावरील नक्षीकाम पाहून दक्षिण दरवाजा व त्याची जाडजूड भिंत पाहून पुन्हा गावातील आणखी एक वेगळेपणावर लक्ष जातं. ते म्हणजे अजमेरच्या घोंगड्या या आजही प्रसिद्ध आहेत. बकरी, मेंढींच्या लोकरापासून घोंगड्या बनविण्याचा मोठा व्यवसाय पूर्वी गावात होता. आता बोटावर मोजण्याइतक्यात कुटुंबांमध्ये घोंगड्या बनविल्या जातात. परंतु त्यांनाही प्रचंड मागणी आहे. अगदी ४०० ते दोन हजार रूपयांपर्यंत घोंगड्या विकल्या जात असल्याचे जिभाऊ केदा नंदाळे यांनी सांगितले. घोंगड्या हातात घेऊन त्या पाहण्याचा आनंद काही वेगळाच. तेथून गावातील महादेव, हनुमान, दत्तमंदिर, राममंदिर, विठ्ठल, भवानी मंदिर पाहत पाहत वेशीबाहेरचा देवळाणेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही समाधी पहायला मिळतात. त्या कोणाच्या आहेत याचा काही तपास लागत नाही. मात्र एक समाधी आत बाहेरून चित्रांनी सजलेली होती. आता तिच्यावरचा फिकट रंग आणि आतील चित्रांच्या छटा तेवढ्या शिल्लक आहेत. या समाधीशेजारील दगडी शिवमंदिरही पाहण्यासारखे आहे. गावाच्या अवतीभवती वीरगळी असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पहाडेश्वर मंदिराला लागून असलेल्या डोंगर सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. वाटेत दगडावर कोरलेले शिवलिंग आहे. तर समोरच्या डोंगरात एका गुहेत आदिवासींचा डोंगरदेव आहे. गडाचा दरवाजा आजमितीस अस्तित्वात नाही. उजव्या हाताला उद्धवस्त बुरुज व तटबंदीचे अवशेष तेवढे पहायला मिळतात. तेथून गडमाथा नजरेस पडतो. अजमेराचा पसारा फार नाही. दोन तलाव, दोन पाण्याची टाके पहायला मिळते. टेहाळणीसाठी असलेल्या अजमेराहून मोरागड, रतनगड, कऱ्हा, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, साल्हेर, सालोटा, मुल्हेर तसेच दुंधागड दिसतात. त्यामुळे अजमेरा गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

अभिरांचे, तैली राजाचे, राजपुतांचे राजधानीचे अजमेर पूर्वी कसे असेल? या स्वप्नरंजनात अजमेरचे वास्तव दर्शनही अनोखे आहे. अजमेर राजधानी होते की नाही हे माहीत नाही. मात्र ते लढवय्ये होते हे नक्की! कारण लढवय्येपणाच्या खाणाखुणा इंग्रजांविरोधातील शेतसारावाढ लढा, जंगल सत्याग्रह, बागलाण सत्याग्रह, भिलवाड सत्याग्रह तसेच स्वातंत्र्यचळवळीतही अजमेरचे गणेश कुलकर्णी, रामचंद्र कुलकर्णी, नरहर शेठ, गोविंद शेठ यांच्यासह अनेक मंडळी सहभागी झाली अन् लढली. आज अजमेर सौंदाणे आपल्या इतिहासाला घेऊन झेपावू पाहत आहे. ते त्यांच्या इतिहासाच्या जोरावरच. मात्र गावातील अनेक खाणाखुणा अन् त्या आठवणी जपल्या गेल्या पाहिजेत. तरच इतिहास दीर्घकाळ प्रेरणा देत राहिलं.
संग्राहक-श्री.ज्ञानेश्वर भालचंद्र पवार
माजी उपसरपंच ग्रामपंचायत अजमीर सौंदाणे ता.बागलाण
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना बागलाण तालुका अध्यक्ष।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here