आशाताई बच्छाव
शेतमालकास तिघा चोरट्यांनी धमकी देत 19 बोकड व 7 बकर्या चोरून नेल्या
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील हिंगोणे शिवारात तीन चोरट्यांनी शेतातील शेडच्या तारा कापून आत प्रवेश करत शेत मालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देवून तब्बल 19 बोकड व 7 बकर्या चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तिघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोणे ता. चाळीसगाव येथील परशराम रूपला चव्हाण यांचे हिंगोणे शिवारात शेत असून शेतातच शेळी पालनासाठी लोखंडी शेड बांधलेले आहे. या शेडमध्ये 10 बकर्या व 19 बोकड असे होते. मंगळवार 17 रोजी सायंकाळी 7.30 वाजता जेवण करून परशराम चव्हाण हे शेतात शेडवर झोपण्यासाठी गेले. बकरींच्या शेडचा पत्र्याचा दरवाजा आतून लावून शेडच्या बाजुस आलेल्या खाटेवर झोपले.रात्री 2 वाजता त्यांना बकरी ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने जाग आली असता एक जण त्यांच्याजवळ येवून हात धरला, दुसर्याने डोके धरले तर तिसर्याने पाय धरून चिल्लाना नही तो काट डालेंगे असे म्हणत एकाने हातातील धारदार शस्त्र मानेला लावले. पाच मिनीटात तिघे चालले गेले.
शेडमध्ये लाईट नसल्याने चव्हाण यांना चोरट्यांचे चेहरे दिसले नाहीत. जातंाना मोठ्या वाहनाचा तसेच दुचाकीचा आवाज आला. ते वडाळा गावाच्या दिशेने गेल्याचे त्यांना आवाजावरून जाणवले. चव्हाण यांनी उठून शेडमध्ये पाहीले तर शेडमध्ये केवळ तीनच बकर्या दिसून आल्या. त्यांनी तडक घर गाठून पत्नी व मुलाला हा प्रकार सांगितला.
शेडच्या दरवाजाच्या बाजुच्या जाळीच्या लोखंडी तारा कापलेल्या दिसून आल्या. चोरट्यांनी सुमारे 1 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 19 बोकड व 7 बकर्या असा ऐवज चोरून नेत चारचाकी वाहनात टाकून पळ काढला. परशराम चव्हाण यांनी आज बुधवारी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून ही आपबित्ती पोलीसांना सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशला भा.न्या.स. कलम 309(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण परदेशी करीत आहेत.दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी भेट देत माहिती घेतली.