आशाताई बच्छाव
“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना
जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका / कर्मचाऱ्यांचा केला जाणार गौरव
अर्ज भरताना महिलांना समस्या भासू देऊ नयेत
जालना, दि. 12 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :- महिलांसाठी राज्यशासनाने “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे. जालना जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करुन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय निवड करुन 15 ऑगस्टला त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे बुधवारी (10 जुलै) आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस सर्व नगर परिषद, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, जालना महानगर पालिकाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरीक्षेत्र) अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका (नागरी क्षेत्र), “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेसाठी नियुक्त वार्डाधिकारी, कर्मचारी (नगर परिषद/नगर पालिका) क्षेत्र कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती सांगावी.