आशाताई बच्छाव
जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणाऱ्या राज्य सरकारकडून राज्यातील दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवला जात असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे संत्रे कुटुंबावर झालेला हल्ला आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या घराची झालेली तोडफोड तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज गुरुवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जवखेडा येथे भेट देऊन त्यांनी विमलबाई बाबूराव संत्रे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला.त्यानंतर भोकरदन व बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकरी,ग्रामस्थांशी संवाद साधला.या दौऱ्यानंतर जालना शहरातील हॉटेल अंबरमध्ये दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जालना लोकसभा मतदार संघातील मविआचे उमेदवार डॉ.कल्याण काळे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले,माजी आमदार चंद्रकांत दानवे,शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, कल्याण दळे, महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार,माजी गटनेते गणेश राऊत,आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे,जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव आदींची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की,राज्यात सध्या भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.