आशाताई बच्छाव
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण कराल तर तुरुंगात जाल!
> दोषींना २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
> परिमंडळात वीज बिलासाठी वसुली मोहिम तीव्र
वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ:
परिमंडळात वीजबिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे.दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना होणारी धक्काबुक्की,शिवीगाळ अश्या निंदणीय घटना परिमंडळात घडल्या आहेत. महावितरणच्या परिमंडळ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. विजेचे बिल वेळेत भरणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे.जर ग्राहक वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसेल तर त्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो.त्यामुळे ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
चालू आर्थीक वर्षाचे केवळ १३ दिवस बाकी आहे, अद्याप परिमंडळातील घरगुती,वाणिज्यिक,
औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून २४२ कोटी वसूल होणे बाकी आहे. ग्राहक वीजबिल भरत नसल्याने महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत कर्मचारी थकबाकीदारांच्या दारात पोहचत आहे.बिल भरले नाही तर वीज नाही असा नाईलाजास्तव पवित्रा घेत महावितरणकडून थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे़.
तथापि वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाणीच्या काही अनुचित घटना परिमंडळात घडल्या आहेत. शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये दोषी व्यक्तीकरीता भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये २ ते १० वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये व्यवस्थापन संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून संबंधितावर नक्की कायदेशीर कारवाई होणार याची जाणीव ठेवत वीज ग्राहकांनी नियमानुसार आणि वेळेत थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.