आशाताई बच्छाव
ब्रेकिंग – जयश्रीताईंच्या उमेदवारीने बुलढाण्यात तुल्यबळ लढतीची शक्यता बळावली! सोज्वळ आणि लढाऊ व्यक्तिमत्वाच्या धनी जयश्रीताई ठरू शकतात जायंट किलर !
बुलढाणा :- बुलडाणा विधानसभा निवडणुकांची रणदुंदुभी पेटल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कोणा-कोणात लढत रंगणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत निवडणुकीत काय होणार, याची एक मोठी चर्चा होती. अखेर २४ आक्टोबर रोजी या चर्चाना पूर्णविराम मिळाला, कारण विद्यमान आमदार तथा शिवसेना (शिंदे गट) उमेदवार संजय गायकवाड यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) च्या उमेदवार म्हणून बुलढाण्यातील अत्यंत सोज्वळ, अभ्यासू आणि जनसामान्यांसाठी सातत्याने लढणाऱ्या लढाऊ अॅड.
जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी घोषित झाली.
जयश्रीताईंचे नाव घोषित होताच मतदारसंघात सातत्याने चर्चा रंगते आहे की, ही लढत अत्यंत तुल्यबळ होणार असून, विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली सगळी ताकद झोकून काम करावे लागणार आहे. जर या मतदारसंघात परिवर्तन झाले, तर बुलढाणा मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळु शकते. याशिवाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या ३० वर्षांतील एक वैशिष्ट्य राहिले आहे की, या मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत निवडून येत नाही. अपवाद फक्त विजयराज शिंदे यांचा आहे. विजयराज शिंदे हे २००४ आणि २००९
असे सलग दोनदा निवडून आले होते. हा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांत या मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळेच या वेळीदेखील ही परंपरा कायम राहते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
• जयश्रीताईंचा मोठा जनसंपर्क
गेल्या सुमारे २० वर्षांपासून अॅड. जयश्रीताई शेळके या सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय आहेत. जिजाऊ ब्रिगेडपासून आपल्या कार्याची सुरवात त्यांनी केली होती. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने संघर्ष केला. मराठा सेवा संघाद्वारे घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमात त्या नेहमीच
सक्रिय असायच्या. राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन जयश्रीताई सातत्याने कार्य करीत आहेत. पुढे जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तेंव्हापासून त्या अत्यंत निष्ठेने काँग्रेससोबतच राहिल्या. २०१४ पासून जेंव्हा देशात आणि राज्यात भाजपची लाट आली होती आणि काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपची वाट पकडली, तेंव्हाही जयश्रीताई या खंबीरपणे आणि निष्ठेने काँग्रेसमध्येच राहिल्या.
सध्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेकडेच राहील, अशी शक्यता होती. जयश्रीताई
यांचे कार्य, त्यांचा मतदारसंघातील प्रभाव, कामाचा झंझावात आणि जनसामान्यांप्रति असलेला कळवळा पाहता, त्यांना या निवडणुकीत उतरवणे गरजेचे असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे झाले असल्यास नवल वाटायला नको. परंतु जयश्रीताई या काँग्रेसमध्ये असल्या कारणाने त्यांना शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश करावा लागला. प्रवेश करताच त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात उमेदवारीची माळ जयश्रीताईंच्या गळ्यात घातली. जयश्रीताई या ओजस्वी वाणीच्या धनी आहेत. भाषणाला उभ्या राहिल्या की, उपस्थितांच्या मनाचा ठाव घेण्याची त्यांची हातोटी आहे. बुलढाणा जिल्ह्यासह मतदारसंघातील समस्यांची त्यांना चांगली
जाण आहे. जयश्रीताईंचे व्यक्तिमत्व हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. विरोधक देखील त्यांच्याविरोधात बोलताना आदरानेच बोलतात. महिलांमध्ये जयश्रीताईंची प्रतिमा अत्यंत धवल अशाप्रकारची आहे. त्यामुळे जयश्रीताईंना हरवणे संजय गायकवाड यांच्यासाठी फारच कठीण जाणार यात शंका नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जयश्रीताई यांना शिवसेना (उबाठा) गटातील ज्या इच्छुकांना उमेदवारी नाही मिळाली, त्या नेत्यांचे मन जिंकावे लागेल. कारण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत हे फार इच्छुक होते. जर जयश्रीताईंनी ही किमया साधली, तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळू शकते, यात काहीच शंका नाही.